कोल्हापूर : ‘वाईट परिस्थिती माणसाला जीवनामध्ये संघर्ष करायला शिकवते. माणसाला चांगले दिवस येण्यासाठी हेच मोठे विद्यापीठ असते. आजच्या पिढीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी सज्ञानी व बलवान व्हायला पाहिजे,’ असे प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीश आनंदराव देशमुख यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी भूषविले.
‘विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखणे गरजेचे असून, दररोज व्यायाम करणे, चांगला आहार व सकारात्मक जगणे यातूनच जीवन चांगले घडते,’ असे विचार देशमुख यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य साळुंखे म्हणाले, ‘स्वतःला व जगाला ओळखायला शिका. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे अडचणीतून जगायला शिकले. ज्ञान आणि संस्कारांनी त्यांना घडविले. विवेकानंद शिक्षण संस्था उभी करून त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणातून सामाजिक विकासाचा ध्यास घेतला पाहिजे. समाज घडविण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे आहे.’
प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थनागीत सादर करण्यात आले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी करून दिला. या वेळी प्रा. मिलिंद कारंजकर यांनी ‘संशोधनातून व्यक्तिमत्त्व विकास कसा साधला जातो’ यावर आपले विचार मांडले. प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. डी. जोशी यांनी आभार मानले.
या वेळी महाविद्यालयातील डॉ. डी. ए. देसाई, डॉ. आरिफ महात, डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. एच. पी. पाटील, डॉ. पी. ए. पाटील, डॉ. मंजुश्री घोरपडे, डॉ. माधवी चरणकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.